राज्यात गणवेशावरून वाद पेटवण्यात काही अज्ञात शक्तींचा हात आहे हे मी आधीपासून सांगत आहे. आता आम्हाला याबाबत धागेदोरे मिळाले असून पोलीस त्यांच्या मागे लागले आहेत. त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

बंगळुरात एका खासगी वाहिनीशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, देशात फुटीरता पसरविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काही धर्मांध संघटना यामागे आहेत हे निश्चित आहे. जनतेने, पालकांनी आणि आमच्या विध्यार्थ्यानी हे जाणून घेतले पाहिजे. यामागे कोण आहेत हे शोधून काढून त्यांचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे ज्ञानेंद्र यांनी सांगितले.
राज्यात या प्रकरणावरून अनुचित घटना घडू नयेत यासाठी १४४ कलम लावण्यात आले आहे. मुलांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही शक्य तेवढ्या संयमाने घेत आहोत. या जातीय, धर्मांध शक्तींनी नाकासमोर चालले पाहिजे ही देशाची अपेक्षा आहे. ते कोण आहेत, काय करताहेत हे सर्वाना माहित झाले आहे. त्यामुळे कोणीही आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नये, आग विझविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शांततेत, सौहार्दाने आमच्या मुलांचा, देशाचा विचार करावा. देशासाठी संघटीतपणे विध्यार्थ्यानी सकारात्मक काम करावे याची प्रेरणा आम्ही त्यांना दिली पाहिजे.
हिजाब प्रकरणाची सुनावणी काल संपेल असे वाटले होते. परंतु न्यायालयाने सर्वांची मते विचारात घेऊन याबाबतची याचिका पूर्ण पीठाकडे वर्ग केली आहे. मुख्य न्यायाधीशांनीही पूर्ण पीठाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. आज पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार आहे. उद्यापर्यंत ती संपेल. लवकरच यावर न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा आहे असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले. न्यायालयाचा निकाल काय येईल या प्रश्नावर, त्याबाबत मला काही बोलता येणार नाही. मात्र वेगवेगळ्या न्यायालयांचा याबाबतचा निकाल, सरकारचे अधिकार आदी सर्व मुद्दे न्यायालय विचारात घेईल असे वाटते. आमचे वकील सरकारची बाजू समर्थपणे मांडत आहेत. सरकारच्या नियमावलीच्या बाजूनेच निकाल येईल अशी अपेक्षा आहे असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले.
